‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर   

ममता यांचा मोदींवर आरोप

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता  बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.केंद्र सरकारने विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय फायद्यासाठी लष्करी कारवाईला  ’ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले, असा आरोप ममता यांनी यावेळी केला.
 
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर प्रथमच पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आलेले पंतप्रधान मोदी यांनी काल एका सभेला संबोधित करताना पश्चिम बंगालचे ‘सिंदूर’शी सांस्कृतिक आणि भावनिक नाते असल्याचे सांगितले. तसेच, दुर्गापूजेदरम्यानच्या ‘सिंदूर खेला’ या पारंपरिक विधीचा उल्लेख केला. यासोबतच, ममतांवर जोरदार टीका केली. 
 
पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा जागतिक मंचावर फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशंना भेट देत आहेत. अशावेळी पंतप्रधानांनी बंगालवर टीका केली. त्यामुळे, माझी निराशा झाली, असे ममता यावेळी म्हणाल्या.
 
विशेष म्हणजे,  तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे संयुक्त जनता दलाचे संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग आहेत. दोन दिवसांपूर्वीच, तृणमूल काँग्रेसने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती.  पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतरही, पाकिस्तानची खुमखुमी कायम होती. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले होते.  मागील काही दिवसांपासून पंतप्रधान विविध राज्यांच्या दौर्‍यावर आहेत. जाहीर सभांमधून ते पाकिस्तानवर जोरदार टीका करत आहेत. यापुढे, भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे सांगतानाच ते भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.
 

Related Articles